March 15, 2016

कोरी पाटी...
लहान मुलांचं मन ,
म्हणजे कोरी पाटी,
आईच्या हातात खडू,
त्यावर लिहिण्यासाठी
आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.
आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात,
होत नाहीत पुढे.
आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.
आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही वाटत नाही,
खरं बोलायचं भय.
आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.
आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.
आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.
आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग,
लावायची कोणाला लागली लाथ तर,
पाया पडायला भाग.
दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.
आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.
आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवते सगळं,
जरी आता सगळं माझ्या हातात!
आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड व्हायच्या पापण्या अन
मिटायचे डोळे आपोआप.
अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.
जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ वाटून खायचे सात.
आई घालायची वाट पाहतांना
कोपऱ्यात पालथा पेला,
एव्हढा भाबडा विश्वास हिने
कुठून पैदा केला?
आई म्हणायची,......,आई म्हणायची,
आता खडू माझ्या हाती,
होता येईल का मला
असं माझ्या चिमण्यासाठी??

;;